Labels

Saturday 28 March 2020

मेरे दुष्मन, मेरे भाई?


पाकिस्तान देशाचा किंवा एखाद्या पाकिस्तानी मनुष्याचा नुसता उल्लेख जरी झाला तरी कपाळावर आठी आणण्यापासून ते पेटून उठून शिवराळ भाषेत त्यांचा उद्धार करणारे लोक मला माहीत आहेत. "अणुबॉम्ब टाकून संबंध पाकिस्तान नष्ट केला पाहिजे"
असे म्हणण्यापर्यंत कित्येकांची मजल जाते. 

गंमत म्हणजे सर्वसामान्य पाकिस्तानी व्यक्तीबद्दल माझ्या मनात राग, द्वेष, तिरस्कार अशा नकारात्मक भावना अकारण येत नाहीत. परंतु तसे मी बोलून दाखवल्यास, "भारतीय सैन्यदलातून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याचे विचार असे कसे?" हा प्रश्न अनेकांना पडतो. अश्या प्रश्नांना माझ्याकडे समर्पक उत्तर आहे आणि ते मी वेळोवेळी लोकांना देत असतो. पण इथे ते उत्तर मांडण्यापूर्वी एक किस्सा सांगणे मला आवश्यक वाटते.

१९९९ साली, भारत व पाकव्याप्त काश्मीरदरम्यानच्या नियंत्रण रेषेजवळील एका युनिटमध्ये माझं पोस्टिंग होतं. त्या क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यानची नियंत्रण रेषा एका छोट्या नदीच्या अंगाने गेलेली आहे. नदीच्या अलीकडील तीरावर भारतीय चौकी आणि पलीकडील तीरावर पाकिस्तानी चौकी अशी परिस्थिती बहुतेक ठिकाणी आहे. म्हणजे दोन्ही शत्रुदेशांचे सैनिक जणू एकमेकांच्या डोळ्याला डोळे भिडवूनच उभे असतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात जरी शस्त्रसंधी करार झालेला असला तरीही प्रत्यक्षात नियंत्रणरेषेवर असलेली परिस्थिती सामान्य नागरिकांच्या कल्पनेपलीकडची असते.

आपल्या वर्तमानपत्रात क्वचित कधीतरी एखादी बातमी छापून येते, "नियंत्रण रेषेवर लागू असलेल्या शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानने भारतीय चौक्यांवर बेछूट गोळीबार केला". प्रत्यक्षात मात्र, दोन्ही देशांच्या कोणत्या ना कोणत्या चौकीकडून एकमेकांच्या दिशेने, जवळजवळ रोज नित्यनेमाने गोळीबार होत असतो. याचे कारण असे आहे की, 'नियंत्रणरेषा' ही आंतरराष्ट्रीय सीमेप्रमाणे नकाशावर आखलेली रेषा नाही. १९४७-४८ सालच्या पाकिस्तानच्या घुसखोरीनंतर जेंव्हा युध्दविराम लागूू झाला तेंव्हा ज्या सैन्याच्या हातात जो भूभाग राहिला तो त्या देशाने आपल्या नियंत्रणात ठेवला. तेंव्हापासूनच दोन्ही देशांच्या दरम्यान एक 'नियंत्रणरेषा' तयार झाली. त्यामुळे, पाकिस्तानी सैन्याला त्या रेषेमागे रेटत राहण्याचा आपला प्रयत्न नेहमीच असतो. तसेच पाकिस्तानही मागे हटण्याऐवजी नियंत्रणरेषा पार करून आणखी भूभाग बळकावण्याच्या प्रयत्नात असतो. म्हणूनच, "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग" हीच वस्तुस्थिती नियंत्रणरेषेवर तेंव्हा होती आणि आजही आहे!

सर्वसामान्यपणे युद्धसदृश परिस्थिती असली तरीही दोन्ही शत्रूदेशांतील सेनाधिकाऱ्यांदरम्यान काही पूर्वनियोजित भेटी होत असतात. ठराविक कालावधीनंतर होणाऱ्या अश्या भेटीला 'फ्लॅग मीटिंग' असे नाव आहे. नियंत्रण रेषेजवळ एखाद्या ठिकाणी, दोन्ही शत्रूदेशांच्या सैन्यातील किमान दोन-दोन अधिकारी या मीटिंगमध्ये सहभागी होतात. दोन्ही सैन्यदलांच्या, त्या क्षेत्रात तैनात असलेल्या चौक्यांमधील काही बारीक-सारीक समस्या किंवा एकमेकांविरुद्धचे आक्षेप यांवर चर्चा केली जाते. शक्य झाल्यास त्यावर काहीतरी तोडगाही काढला जातो. ही मीटिंग सुरु असताना दोन्ही बाजूंकडून तात्पुरते पांढरे निशाण लावलेले असते आणि गोळीबार बंद असतो. मीटिंग संपवून आपापले अधिकारी सुरक्षित स्वगृही परतल्यानंतर मात्र पुन्हा कधी गोळीबार सुरु होईल याची शाश्वती नसते. 

एकदा अशाच एका 'फ्लॅग मीटिंग' मध्ये सहभागी होण्यासाठी माझी नेमणूक झाली. भारताकडून मी आणि माझ्यापेक्षा काही वर्षांनी वरिष्ठ असलेला, पण माझ्या जुन्या ओळखीतील एक अधिकारी असे दोघे जाणार होतो. आम्ही दोघेही आपापल्या वाहनातून फ्लॅग मीटिंगसाठी निघालो. सोबत सशस्त्र जवानांची गाडीही होती. एका ठिकाणी आमची वाहने आणि जवान थांबले व आम्ही दोघेच निःशस्त्र होऊन मीटिंगसाठी ठरवलेल्या ठिकाणी पायी चालत निघालो. झाडा-झुडपातून वाट काढत आम्ही दोघेच पुढे जात असताना माझ्याबरोबरचा तो अधिकारी अचानक गप्प झाल्याचे मला जाणवले. नुसताच इकडे-तिकडे पाहत तो चालत होता. मी 'सिग्नल्स कोअर' म्हणजे 'संपर्क व दळण-वळण' विभागाचा अधिकारी होतो. फ्लॅग मीटिंगचा माझा तो पहिलाच अनुभव होता. माझ्यासोबतचा अधिकारी माझ्यापेक्षा वरिष्ठ आणि 'इन्फन्ट्री' म्हणजे पायदळ विभागाचा असल्याने त्याला कदाचित अश्या फ्लॅग मीटिंगचा पूर्वानुभव असू शकेल असा माझा कयास होता. पण तो अचानक गप्प झाल्याने, त्याला या मीटिंगचे दडपण वाटू लागले असेल की काय असा विचार मनात येऊन जरा नवल वाटले. पण मी काहीच बोललो नाही.

मीटिंगसाठी निवडलेली जागा नदीच्या अलीकडच्या तीरावर थोड्या दाट झाडीत होती. तेथे उभारलेल्या शामियान्यात आम्ही स्थानापन्न झालो. थोड्याच वेळात, प्रवाह उथळ असलेल्या एका ठिकाणी नदी पार करून  पाकिस्तानचे तीन अधिकारी त्या शामियान्यात पोहोचले. आपापल्या गणवेशांमध्ये आलेल्या भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांदरम्यान झालेली ती फ्लॅग मीटिंग म्हणजे माझ्यासाठी एक आगळाच प्रसंग होता. सुरुवातीला औपचारिक ओळख, हस्तांदोलन आणि काही प्राथमिक बोलणे झाले. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून पूर्वनियोजित मुद्द्यांवर चर्चा सुरु झाली. इथे गमतीचा भाग म्हणून त्या चर्चेतील फक्त एकच लहानसा मुद्दा सांगतो.

पुणे-मुंबई-नागपूर-औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये राहणाऱ्या, आणि पंपाने गच्चीवरच्या टाकीत पाणी चढविणाऱ्या किंवा घरातील नळातून पिंपात पाणी भरणाऱ्यांना, मी सांगतोय त्या वस्तुस्थितीची कल्पना करणे थोडे कठीण जाईल व वाचून हसूही येईल. आम्ही मीटिंगसाठी जिथे बसलो होतो त्या व आसपासच्या क्षेत्रात दोन्ही शत्रूदेशांच्या चौक्यांमधील जवान रोज नियंत्रणरेषेवरील नदीपात्रात उतरून नदीचे पाणी भरून आणीत व वापरीत असत! तिथे कुठले आलेत नळ, टाक्या आणि पंप?

"एकमेकांवर बंदुका रोखून बसलेले दोन्ही देशांचे जवान रोज-रोज अश्या परिस्थितीत नदीतून पाणी भरण्याचं धाडस कसे काय करीत असतील?" हा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे.
प्रत्यक्षात दोन्हीकडून एक ठराव झालेला असायचा. घड्याळाप्रमाणे दोन तास, समजा सकाळी ८ ते १०, एका देशाच्या सैनिकांना पाणी भरण्यासाठी राखीव ठेवलेली वेळ असे. त्या काळात दुसऱ्या बाजूने गोळीबार केला जात नसे. तसेच दुसऱ्या बाजूच्या सैनिकांसाठी वेगळ्या वेळी, पाणी भरण्यासाठी, दोन तास  शत्रूच्या गोळीबारातून सूट असे! 

आमच्यासमोर बसलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांचा आक्षेप असा होता की एकदा, अमुक तारखेला, पाणी भरण्याची त्यांची वेळ असताना भारतीय चौकीवरून गोळीबार केला गेला होता व पाकिस्तानी सैनिकांना बादल्या व पखाली तिथेच टाकून पळ काढावा लागला होता. "तसे जर तुमच्याकडून होणार असेल तर आम्हालाही तसेच उत्तर द्यावे लागेल" अशी धमकीवजा कुरकूरदेखील त्यांच्याकडून आली.
"त्या चौकीवरील गस्त नुकतीच बदलली असेल व त्यामुळे गैरसमजातून तसे झाले असेल" असे काहीतरी स्पष्टीकरण आम्ही दिले. परंतु, त्या मुद्द्याची नोंद केली गेली आणि तसे भविष्यात होणार नाही असे आश्वासन दिले गेले. आपापल्या चौक्यांवरील जवानांना संयम राखण्यासाठी योग्य ती समज देण्याचेही ठरले!

इतर सर्व लहान-मोठे मुद्दे बोलून झाल्यावर चर्चा संपली. चर्चेनंतर आम्हा सर्वांसाठी चहा-पकोडे आणि मिठाई समोर आली. एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने "पाईन" ब्रॅण्डची सिगारेट काढली आणि आमच्या पुढ्यात धरली. आम्ही दोघेही सिगारेट ओढत नसल्याने आम्ही नकार दिला. मग चहा-पकोड्यांचा आस्वाद घेता-घेता चक्क हलके-फुलके बोलणे सुरु झाले. माझ्यासोबत आलेला माझा वरिष्ठ सहकारी अजूनही चिडीचूपच होता. मी आणि एक पाकिस्तानी अधिकारी मात्र सैनिकी विषय सोडून इतर वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारीत होतो.
बोलता-बोलता अचानक तो पाकिस्तानी अधिकारी म्हणाला, "सुना है माधुरी शादी कर रही है। और वो भी अपने सेक्रेटरी के साथ? ये पढकर कुछ अच्छा नहीं लगा।"

पाकिस्तानात एकूणच बॉलिवूड सिनेमे, सिनेकलाकार आणि आपली फिल्मी मासिके अतिशय लोकप्रिय आहेत हे मला माहीत होते. पण तरीदेखील काही क्षण त्याच्या बोलण्याचा संदर्भ कळेना. मग लक्षात आले की फिल्मफेयर किंवा तत्सम कोणत्या तरी फिल्मी मासिकांत एखादी सवंग गॉसिप छापून आली असणार. त्या गॉसिपच्या आधारे, अभिनेत्री माधुरी दीक्षितसंबंधी त्याने ती टिप्पणी केली होती.

त्यावर मी चेष्टेच्या सुरात म्हटले, "माधुरी अगर शादी कर भी ले, तो मुझे कोई टेन्शन नहीं है। मैं तो शादीशुदा हूँ। और मुझे यकीन है कि आपका चान्स तो बिलकुल नहीं लगनेवाला।"
त्यावर दिलखुलास हसून तो म्हणाला, "नहीं भाई, हमारी भी ऐसी कोई तमन्ना नहीं है, क्योंकि हम भी शादीशुदा हैं। हम तो ऐसेही पूछ रहे थे कि शायद आपको इस बारेमें कुछ और मालूमात हो।"
तरीही मी त्याला आणखी खिजवायला म्हटलं, "लेकिन आप तो बाकायदा चार शादियाँ कर सकते हैं।"
त्यावर त्याने खिन्न भाव चेहऱ्यावर आणत उत्तर दिलं, "जनाब, एक मोहतरमा को झेलना मुश्किल है, चार-चार शादियाँ कौन करेगा?"
त्याच्या या उत्तरामुळे, आपण सगळेच समदुःखी आहोत यावर एकमत होऊन आम्ही खळखळून हसलो.

मीदेखील पाकिस्तानी अभिनेत्री, गायक-गायिकांबद्दलचे माझे ज्ञान पाजळले. त्यावर ते पाकिस्तानी अधिकारीही खूष झाले. अशाच काही गप्पा करून शेवटी आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. हे सगळे कितीही अविश्वसनीय वाटले तरी प्रत्यक्षात घडले होते. तिथे जणू शत्रू समोरासमोर बसलेले नव्हते, तर माणसांसारखी माणसेच एकमेकांशी गप्पा मारीत होती. अंगावर गणवेश निराळे होते इतकेच.
मला वाटते की, "बॉर्डर" सिनेमातल्या "मेरे दुश्मन, मेरे भाई, मेरे हमसाये" या गाण्यातून असंच काहीतरी सांगायचा प्रयत्न केला गेला आहे.

मीटिंग संपून आम्ही दोघे परत येत असताना मात्र न राहवून मी माझ्यासोबतच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारलंच, "काय सर, तुम्ही अगदी गप्प-गप्प का आहात?"
"कुछ नहीं यार, बस ऐसेही" असं  म्हणून त्यानं उत्तर टाळलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी जी बातमी समजली त्यावरून त्या अधिकाऱ्याच्या मौनव्रताचं कारण माझ्या लक्षात आलं. मला मनापासून अतिशय आनंद झाला आणि त्या अधिकाऱ्याचा प्रचंड अभिमानही वाटला.

तो अधिकारी मीटींगच्या काळात जरी गप्प-गप्प असला तरी मीटिंगला जाताना आणि येताना तो बारकाईनं चहूबाजूचं निरीक्षण करीत होता हे मी पाहिलं होतं. मला समजलेली बातमी अशी होती की, फ्लॅग मीटिंगसाठी ज्या मार्गाने आम्ही दोघे सकाळी पायी जाऊन परत आलो होतो त्याच मार्गाने, त्याच रात्री, त्या अधिकाऱ्याने स्वतःच्या बटालियनच्या कमांडो प्लाटूनचे जवान गुपचूप नदीपर्यंत पाठवले होते. ज्या मार्गाने ते तिघे पाकिस्तानी अधिकारी उथळ पात्रातून नदी पार करून अलीकडच्या तीरावर आले होते त्याच मार्गाने आपले कमांडो नदीपार गेले होते. रात्रीच्या अंधारात, शत्रूला चाहूलदेखील न लागू देता, पाकिस्तानची चौकी संपूर्ण उध्वस्त करून त्यातील पाकिस्तानी सैनिकांना ठार करून ते आले होते!

आपण जणू 'बावळे ध्यान' असल्याचे दाखवीत माझ्यासोबत आलेल्या त्या माझ्या वरिष्ठ सहकाऱ्याने त्याच्या "अंगी नाना कळा" असल्याचा पुरेपूर प्रत्यय दिला होता. पाकिस्तानलाच नव्हे तर मलादेखील अंधारात ठेवून!
कारण त्याच्या डोक्यात असे काही करण्याचे शिजत होते याचा पत्ता त्याने मलाही मुळीच लागू दिला नव्हता.
या प्रसंगानंतर एकदा आमची भेट झाली तेंव्हा मात्र त्याने नुसतेच माझ्याकडे पाहून "अब आई बात समझ में?" अश्या अर्थाचे स्मितहास्य केले होते! 

"तुम्ही भारतीय सैन्यदलाचे एक सेवानिवृत्त अधिकारी असूनदेखील पाकिस्तान्यांबद्दल तुमच्या मनात चीड उत्पन्न होत नाही असे कसे म्हणता?" अश्या अर्थाचे प्रश्न जेंव्हा मला विचारले जातात तेंव्हा माझं उत्तर स्पष्ट असतं.
युद्धभूमीवरील पाकिस्तानी सैनिक, भारतविरोधी घातपाती कृत्ये करणारा अतिरेकी, किंवा तश्या कृत्यात अप्रत्यक्षपणे सहभागी असणारा प्रत्येकजण माझाही वैरीच आहे. एवढेच नव्हे तर, त्यांच्याशी वागताना संत तुकोबांच्या, "अधमासी व्हावे अधम।" या वचनाप्रमाणेच वागले पाहिजे हे निश्चित.
परंतु, सामान्य पाकिस्तानी नागरिकाचा उठसूट द्वेष करण्याची आपल्याला काहीच गरज नाही. किंबहुना, आपल्यासारखाच एक मनुष्य या नात्याने, एखाद्या पाकिस्तान्याबद्दल आपुलकी अथवा प्रेमदेखील असणं यातही काही गैर नाही असं मला प्रकर्षाने वाटतं. तसंच मी हेही ठामपणे मानतो की, भारताचा भूभाग बळकावून आपल्यावरच बंदुका रोखून 'नियंत्रणरेषेवर' तैनात असलेल्या पाकिस्तानी सैनिकांची गय करण्याचंही आपल्याला अजिबात कारण नाही. जिथे-जिथे आणि ज्या-ज्या पद्धतीने त्यांना ठेचता येईल तिथे-तिथे त्यांना नामोहरम करण्यातच आपले राष्ट्रहित आहे.

माझ्या या दोन्ही परस्परविरोधी भासणाऱ्या विचारांमागचं सूत्र एकच आहे...  

"Everything is fair in love and war !"

29 comments:

  1. अशाच अनेक अनुभवाची वाट पाहतो आहे

    ReplyDelete
  2. आशय व मांडणी , दोन्ही छान. ... माधव

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! 🙏 माधवकाका रहाळकर?

      Delete
  3. सर खूप छान लिहिले आहे तुम्ही,सगळे अनुभव लिहून झाले की पुस्तक रूपाने प्रसिध्द करता येईल.
    सौ सीमा पोपटराव चव्हाण

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. ही कल्पना अनेकांनी बोलून दाखवली. मनावर घ्यावे लागेल. 🙂

      Delete
  4. आणखी एक आगळा अनुभव, छानपणे चितारलेला.

    ReplyDelete
  5. आनंद खरेच छान लिहितोस जसा बोलतोस तसाच. आणखी लिही. ज्योत्स्ना

    ReplyDelete
  6. आनंद खरेच छान लिहितोस जसा बोलतोस तसाच. आणखी लिही. ज्योत्स्ना

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks, Jyotsna. Two more already in the pipeline. Posting each one after a gap of a few days to avoid overload. 🙂

      Delete
  7. अशाच थरारक पुढच्या लेखाच्या प्रतीक्षेत...

    ReplyDelete
  8. Learnt of Very unique exp of being part of flag meeting and liked d action taken afterwards by your collegue.

    ReplyDelete
  9. Thank you so much for sharing this experience

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks for your appreciation. Your identity not known. 🤔

      Delete
  10. Thanks Colonel for narrating an important event.
    Your experience and perspective both make one think whether the ill feeling for average Pakistani is justified or necessary.

    Milind Ranade HEG Ltd

    ReplyDelete
  11. Sujit Bhasme - mandani khup Chan. Aankhi barech lekh vachayala milot amhala.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद!🙏
      आणखी लिहायचा विचार आहे. 🙂

      Delete
  12. उगीचच,ऊठ-सूट पाकिस्तानी जनतेचा द्वेष करु नये हा खूपच समंजस विचार तुझ्या अनुभवातून छान मांडला आहेस.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks.
      I genuinely feel so.
      I have some nice anecdotes about contact with Pakistanis and Bangladeshis, after my retirement. So, technically, they can't form part of this blog. I shall put them up on another blog later.

      Delete
  13. म्हणजे कर्नल तुमच्या त्या वरीष्ठ सहकाऱ्यानी त्यांच्या आधीच्या अनुभवाचा फायदा घेऊन दुसऱ्या दिवशीची व्युहरचना करण्यासाठी भौगोलिक परिस्थिती अवलोकन करण्यासाठी वापरला....तसेही आधी फौजी अधिकाऱ्याप्रमाणे आणि नंतर सामान्य माणसाप्रमाणे वागणं हे एकाच व्यक्तीचे दोन पैलू पण शेवटी ऐन मोक्याच्या क्षणी देशासाठी झोकून देता म्हणूनच भारतीय सैनिकांचा अभिमान आहे. तुमच्या मुळे या अशा पैलूंवर प्रकाश पडला लेखन शैली उत्तम... धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! 🙏
      आपले नाव समजले असते तर बरे वाटले असते. ब्लॉगरवर आपण आपली प्रोफाईल रजिस्टर केलेली नसल्याने आपले नाव दिसत नाहीये. 😒

      Delete
  14. आमच्या नेहमिच वाचण्यात ऐकण्यात येते की पाकिस्तानने शस्त्रसंधिचे उल्लंघन केले.त्याला चोख उत्तर दिले आपल्या सैन्यांनी.पाकीस्तान काय आणि चिन काय दोघेही विश्वासघातकी आहेत.पण नेहमिच असे घडते युद्ध बांम्बस्फोट
    अंतर्गत हल्ले यामधे सामान्यजनता भरडली जाते.कट करणारा आणि करवणारे यात त्यांना काही हानी पोचन नाही.उलट
    अति महत्वाच्या व्यक्ती स ओलिस धरुन most wantedअतिरेक्याच्या सुटकेची मागणी केली जाते.व त्यांना दुर्दैवाने सोडावे लागते.जिवितहानी वाचवण्यासाठी .
    विमानअपहरणाच्यावेळची गोष्ट.आठवली.

    ReplyDelete
  15. सविस्तर अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

    ReplyDelete