Labels

Friday 3 April 2020

आमार शोनार बांगला

अलीकडेच सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट लिहिताना मी गुरुदेव रबिंद्रनाथ टागोरांचा उल्लेख करून त्यांच्या एका भाषांतरित कवितेतील काही ओळी उद्घ्रृत केल्या होत्या. त्यावर आलेली एक प्रतिक्रिया अतिशय लक्षवेधी होती. गुरुदेवांच्या त्या कवितेचे स्मरण मी करून दिल्याबद्दल एका बांगलादेशी मुस्लिम माणसाने
मला धन्यवाद दिले होते. 

प्रथमतः, एका बांगलादेशीयाची अशी प्रतिक्रिया वाचून मला आश्चर्य वाटले होते. पण जरा विचार केल्यावर लक्षात आले की नकाशावर रेघा ओढून आणि जमिनीवर काटेरी तारांची कुंपणे उभारून आपण फक्त त्या जमिनीचे तुकडे पाडू शकतो. त्या प्रदेशातील भाषा आणि संस्कृति यांचे तेथील माणसांवर झालेले संस्कार संपूर्णपणे पुसून टाकणं मात्र अशक्य आहे.

सहजच, बांगलादेशीयांशी संबंधित दोन आठवणी माझ्या मनात जाग्या झाल्या. एक हृदयस्पर्शी प्रसंग २००४ साली दिल्लीत घडताना मी पाहिला होता. आणि साधारण तसाच धागा असलेला, पण थोडा विनोदी प्रसंग त्यापूर्वी, म्हणजे १९९४ साली अलाहाबादला मी स्वतः अनुभवला होता.

२००४ आणि २००५ ही दोन्ही वर्षे, मी NCC च्या गणतंत्र दिवस (RD) कँपचा सिग्नल अधिकारी होतो. अतिशय सुसूत्र आयोजन, दिमाखदार परेड, नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रम आणि अनेक मान्यवरांच्या भेटी व भाषणे ही या कँपची ठळक वैशिष्ट्ये असतात. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून आलेली अतिशय गुणी अशी निवडक मुली-मुले या RD कँपमध्ये सहभागी होतात. सुमारे सव्वा महिना चालणाऱ्या RD कँपची संपूर्ण टेलिफोन संपर्क यंत्रणा उभी करणे आणि ती बिनचूकपणे चालवणे हे माझे काम होते. तसेच, त्या कँपमध्ये होणाऱ्या सर्व कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या साऊंड सिस्टमचे नियोजन, उभारणी, आणि संयोजन करण्याची जबाबदारीही माझ्याकडेच होती. 

मी व माझ्या हाताखालच्या अधिकारी आणि जवानांनी अक्षरशः झटून आणि झपाटून सर्व यंत्रणा उभारली होती. केंद्रीय गृहमंत्री लाल कृष्ण आडवाणी आणि पंतप्रधान वाजपेयींच्या भाषणांसाठीचे ध्वनिसंयोजन आम्ही बिनचूक साधले होते. रोजच्या सरावापासून ते सर्व मुख्य कार्यक्रम पार पडेपर्यंत मी स्वतः साऊंड रूममध्ये हजर असे. त्यामागे मुख्यत्वे कर्तव्यबुध्दी जरी असली तरी थोडा स्वार्थही आपोआप साधला जाई. स्वार्थ म्हणण्याचे कारण असे की, सर्व राज्यांचे संघ आपापल्या राज्याची संस्कृति, पारंपरिक नृत्ये व संगीत सादर करण्याच्या स्पर्धेसाठी दररोज संध्याकाळी सराव करीत असत. तो पाहताना, भारताच्या विविध राज्यांचा भूगोल, इतिहास, साहित्य, कला, प्रेक्षणीय स्थळे अशा अनेक गोष्टींची माहिती सहज मिळून जाई. नेहरूंच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' ह्या पुस्तकाची संक्षिप्त दृकश्राव्य आवृत्ती वाचल्यासारखे वाटे. रोजचा सराव पाहताना उजळणी होत असल्याने, मुख्य कार्यक्रम पार पडेपर्यंत, भारतीय भूगोल आणि गोष्टीरूप इतिहास मला जवळजवळ पाठ झाला होता. 

या कँपमध्ये थोडे दिवस सहभागी होण्यासाठी आपल्या काही मित्रदेशातील विद्यार्थी कॅडेटही येत असतात. त्यावर्षी बांगलादेशच्या छात्रसेनेचे कॅडेट RD कँपमध्ये सहभागी झाले होते. एका संध्याकाळी, भारतीय कॅडेट आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा सराव करीत असताना बांगलादेशचा संघही तेथे उपस्थित होता. नाट्य, नृत्य, आणि संगीताद्वारे आपापल्या राज्यांची झलक सादर करणाऱ्या भारतीय कॅडेट्सची तयारी पाहून ती बांगलादेशी मुले-मुली भारावून गेलेली दिसली. त्यांच्यासोबत आलेले त्यांचे प्राध्यापक व प्रशिक्षक त्या मुुलामुलींना स्टेजवर जाऊन काहीतरी सादर करण्याचा आग्रह करू लागले. ती मुले-मुली थोडी लाजतच स्टेजवर गेली. थोडी चर्चा आणि मनाचा हिय्या करून त्यांनी एक गीत गायला सुरुवात केली. परंतु त्यांच्याकडे काहीच वाद्ये नसल्याने त्यांनी पायांनी स्टेजवर, आणि एका हाताने दुसर्‍या हातावर असा ठेका धरला होता. 

ते गीत सुरू होताच भारतीय कॅडेट्सपैकी एका गटात हातवारे आणि जोराची कुजबूज होऊ लागली. काही क्षणातच ती भारतीय मुले-मुली स्वतःची वाद्ये उचलून स्टेजकडे धावली. बांगलादेशी कॅडेट गाणेे गायचे थांबून त्यांच्याकडे पाहू लागले. भारतीय कॅडेट स्टेजवर पोहोचताच त्या दोन्ही गटात थोडी हलकी कुजबूज झाली. काही क्षणातच ते दोन्ही गट एकत्र उभे राहून तेच गीत वाद्यांच्या साथीने गाऊ लागले. 

तो भारतीय कॅडेट्सचा गट म्हणजे पश्चिम बंगालचा संघ होता. आणि ती सर्व मुले-मुली मिळून जे गीत गाऊ लागले, ते होते बांगलादेशचे राष्ट्रगीत "आमार शोनार बांगला..."

गाता-गाता, अगदी सहजच त्यापैकी पुष्कळश्या मुलांचे डोळे पाणावले. गीत संपताक्षणी काही भारतीय व बांगलादेशी कॅडेट्सनी एकमेकांना कडकडून मिठ्या मारल्या. तर काहींच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले. मला त्या गीताचा इतिहास माहीत असल्याने मलाही तो प्रसंग अतिशय हृदयस्पर्शी वाटला. 

१९०५ साली इंग्रज सरकारने धर्माच्या आधारावर बंगालची फाळणी केली होती. त्या फाळणीच्या निषेधार्थ गुरुदेव रबिंद्रनाथ टागोरांनी "आमार शोनार बांगला" ही कविता लिहिली होती. १९११ मध्ये ही फाळणी रद्द झाली. परंतु १९४७ साली बंगाल पुन्हा एकदा धर्माच्या आधारे विभाजित होऊन पूर्व पाकिस्तान अस्तित्वात आला. 

१९७१ साली पाकिस्तानचे वर्चस्व झुगारून जेंव्हा बांगलादेश जन्माला आला तेंव्हा या नवीन देशाने गुरुदेवांच्या "आमार शोनार बांगला"  या कवितेच्या पहिल्या दहा ओळी हेच आपले राष्ट्रगीत ठरवले. बांगलादेशच्या जन्मानंतर ३३ वर्षांनी, स्टेजवर घडत असलेला तो प्रसंग पाहताना माझ्या अंगावर काटा आला होता. लाक्षणिक रूपाने का असेना, पण बंगालची दुसरी फाळणीही काही क्षणांपुरती रद्द झाली असेच मला वाटले होते. 

"पंछी, नदियाँ, पवन के झौंके, कोई सरहद ना इन्हें रोके" या गीतात म्हटल्याप्रमाणेच भारत-बांगलादेश दरम्यान असलेले काटेरी तारांचे कुंपण रबिंद्र संगीताच्या लहरींना कधी अडवू शकेल का? 

त्या कुंपणाच्या दोन्ही बाजूला असलेली माणसे एकसारखीच असल्याचा प्रत्यय यापूर्वीही, म्हणजे १९९४ साली, मी अलाहाबादला असताना मला आला होता. पण त्याबद्दल नंतर सांगेन. 

36 comments:

  1. निसर्गाचा कुठलीच सरहद काय हद्दपण नसते.
    पण धर्माचे कुंपण घालून घेतले की बाकीचे सगळे म्हणजे बोलाचीच कढी अन्......

    ReplyDelete
    Replies
    1. 👍 आपल्या कॉमेंटखाली आपले नाव दिसत नाही. कळवल्यास बरे होईल.

      Delete
    2. प्रसंग नजरेसमोर ऊभा राहिला. मन काहीसे भारावले. खूपच छान शब्दांकन.
      तसच नेहमीप्रमाणे आपण जे विचार मांडता ते यथार्थ आहेत. सदर विचारांशी सहमत आहे.
      लिहीत रहा व आनंद देत आणि घेत रहा. धन्यवाद . मित्रगोत्री

      Delete
    3. 🙏 धन्यवाद मित्रा! ☺️

      Delete
    4. छान , समर्पक , असं लिहीत रहा... माधव

      Delete
    5. Apratim.. khoop chhan.. Col Pandit

      Delete
    6. धन्यवाद सर! 🙏

      Delete
  2. खूप छान सर 👌👌

    ReplyDelete
  3. Your sensitive and lucid writings really make it a great reading.
    You are blessed with a good heart,keen observation and poignant writings.
    Prakash Lakhe.

    ReplyDelete
  4. 1995 मध्ये मी एक वर्ष बांगला देशात होतो. तिथल्या एका मुस्लिम मित्राच्या आई वडिलांनी मला घरी जेवायला बोलवून आग्रहाने खाऊ घातलं. निघताना मी त्यांना आपल्या पद्धतीने वाकून नमस्कार केला तेव्हा मिठी मारून ते मला म्हणाले, "1947 सली आम्ही चूक केली."

    बाहेर आल्यावर तो मित्र कळवळून मला म्हणाला, "मी त्यांच्याशी सहमत आहे, पण कृपया हे कोणाला सांगू नकोस."

    ReplyDelete
  5. फारच छान.... विद्यार्थ्यांनी संस्कृती एक आहे हे उत्स्फूर्त पणे दाखवून दिले. अशा प्रसंगात भेदभाव मिटतो हे ऐकून माहित होते.. त्याला दुजोरा मिळाला.. धन्यवाद. छान लिहिलय.... सतीश चिंतलवार

    ReplyDelete
  6. Anand! 'Aprateem!' is all that I can say after reading about your experience & feelings on seeing those young cadets disolving the 'narrow domestic walls' albiet for a few memorable moments. Beautifully written!
    In 2011-2013, I was posted in Kolkata, where, for a week astride 16 Dec we commemorated Vijay Diwas. About 40-50 Bangladeshi ex-Mukti Bahini soldiers alongwith their families attend this annual event. In one of the evening social events in 2012, one of the Mukti Jodhas, as they are called, climbed up onto the podium & started singing 'Amaar Sonar Bangla'..within minutes a few hundred Veteran Officers, both Mukti Jodhas & our own Bengali Officers joined him in this wonderful song. One could see the deep attachment to the song & sincere pride in their eyes & puffed up chests as they shared this common piece of their eons of bonding & shared heritege! Truly, boundaries on the ground do not constitute boundaries in the heart & mind!

    ReplyDelete
    Replies
    1. Wow! That's a wonderful memory. You must pen it down in greater detail. And thanks for the compliment. You write so well. An appreciation from you means a lot!

      Delete
  7. इस सिमाविरहित बंधुभाव में नोबल विजेता रबीन्द्रनाथ जी ने जो देखा उसी भाव को मैंने आपकी इस ब्लॉग में अनुभव किया। यहीं तो हिन्दुस्थान कि खरी शक्ति हैं। वसुधैव कुटुंबकम्।

    ReplyDelete
  8. Anand I read it twice and was in tears at the end. Very touching experience narrated in such a lucid way! Keep writing. बांगला देश स्वतंत्र झाला त्यावेळी 1971 मध्ये माझे सासरे मुंबईत DMER होते. ते डॉक्टर लोकांची टीम घेऊन कलकत्ता येथे गेले होते त्यांनी सांगितले ल्या काही गोष्टी आठवल्या. पनछि नदीया हे माझं अतिशय आवडणारे गाणे आहे. Ravindra नाथां चे गीत Bangladesh राष्ट्रगीत म्हणुन वापरू शकतो पण आपण वंदे मातरम नाही वापरत याचे वाईट वाटते. मनात आलं ते लिहिले ज्योत्स्ना Karandikar

    ReplyDelete
    Replies
    1. सविस्तर अभिप्रायाबद्दल आणि कौतुकाबद्दल धन्यवाद! 🙂
      'वंदे मातरम' या बंकिमचंद्रांच्या गीताला 'जन गण मन' च्या तोडीचे मानाचे स्थान नाही याचा विषाद वाटणे साहजिक आहे.
      एक मजेदार योगायोग म्हणजे भारत व बांगलादेश या दोन्ही देशांची राष्ट्रगीते रविंद्रनाथांच्याच लेखणीतून उतरलेली आहेत! 🙂

      Delete
  9. Very nicely written event & account,specially very touching incident covered by you signifies that basically we were & are one people at heart, divided by political borders like Germany earlier,Korea,Austria etc.
    We had a golden chance in 1971 to correct d historical blunder of 1947 but we lost that chance under the leadership of Mrs Gandhi & Sheikh Mujibur Rehman then, was a possibility to consolidate & redraw borders then.

    ReplyDelete
  10. नवीन कुंपणे बनवायच्या सर्वदूर चालू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमी वर तर हि कथा फारच भावली.

    ReplyDelete
  11. Very touching experience narrated in a nice words

    ReplyDelete
  12. Very touching and well written!
    It amazes me that Rabindranath Tagore has influenced not just one or two but three national anthems of subcontinent directly/ indirectly and I like them all :-)

    ReplyDelete
    Replies
    1. Well said Sampada!
      Not many people would have heard of the Sri Lankan national anthem "Namo Namo Matha.. "
      Notwithstanding the controversy about whether it was written by Gurudev or he just provided the inspiration, the fact remains that he had a connection with it!

      Delete
  13. सिमाविरहित बंधुभाव जपला त्यांनी खूप कौतुकास्पद आहे.हृदयस्पर्शि आहे.ज्यावेळी क्स्वारांतिकारक पकडले जात तेव्हाही ते वंदे मातरम म्हणत असत आणि लाठ्या झेलत असत.पंचम जाँर्ज भारतभेटिसाठी येणार होते त्यांच्याकरिता या गीताची रचना झाली अशीही वदंता होती.जनगण मन बँडवर वाजवता येते वंदे मातरम नाही असेही वाचल्याचे स्मरते .खर काय?पण ती मुले योग्यच वागली.

    ReplyDelete
  14. अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    ReplyDelete