Labels

Monday 13 April 2020

बांगलादेशीयांची अशीही 'हेरगिरी'!

"आमार शोनार बांगला" अश्या शीर्षकाखाली लिहिलेल्या माझ्या अनुभवात, भारतीय NCC कॅडेट आणि बांगलादेशी छात्रसैनिकांदरम्यान २००४ साली घडलेल्या एका हृदयस्पर्शी प्रसंगाचे वर्णन मी केले आहे. परंतु, त्यापूर्वीही एकदा बांगलादेशीयांशी माझा संपर्क आला होता. ती  आठवणदेखील अविस्मरणीय आहे. 

डिसेंबर १९९२ ते जून १९९६ अशी जवळजवळ साडेतीन वर्षे, अलाहाबाद SSB मध्ये
गट चाचणी अधिकारी, म्हणजे Group Testing Officer (GTO) या पदावर मी काम करीत होतो. अलाहाबाद, भोपाळ आणि बंगळुरू या तीन ठिकाणी भारतीय सैन्यदलाची अधिकारी निवड केंद्रे (Selection centres) आहेत. त्या प्रत्येक केंद्रात तीन किंवा अधिक सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) आहेत. अधिकारी निवडीची प्रक्रिया अतिशय सखोल आणि शास्त्रोक्त असते. त्याचे स्वरूप आणि त्यातील बारकाव्यांबद्दल पुन्हा केंव्हातरी सांगेन. ही निवड प्रक्रिया दुसऱ्या महायुद्धाच्या काळात विकसित झाली आणि देशोदेशी वापरात आली. अगदी अत्यावश्यक असे बारीक-सारीक बदल वगळता मूळ निवडपद्धतच आजही आपल्या आणि शेजारच्या मित्र व शत्रुदेशातदेखील वापरात आहे. 

१९९४ सालची गोष्ट असेल. भारतीय सेनाधिकाऱ्यांच्या निवडप्रक्रियेचा जवळून अभ्यास करण्याच्या उद्देशाने, बांगलादेशी सिलेक्शन बोर्डाच्या काही अधिकाऱ्यांचा एक चमू अलाहाबाद SSB च्या दौऱ्यावर आला होता. त्या चमूमध्ये, एक ब्रिगेडियर, दोन लेफ्टनंट कर्नल आणि एक नौदलातील लेफ्टनंट कमांडर (म्हणजे आर्मीच्या मेजर हुद्द्याच्या बरोबरीचा) असे चार अधिकारी होते. निवडप्रक्रियेबाबत माझा स्वतःचा उत्तम अभ्यास असल्याने, आठवडाभराच्या त्यांच्या या दौऱ्यामध्ये त्यांचा संपर्क अधिकारी (Liaison Officer) म्हणून माझी नेमणूक झालेली होती. आपली निवड प्रक्रिया त्यांना समजावून सांगणे, संपूर्ण प्रक्रियेचे निरीक्षण ते करीत असताना त्यांना आलेल्या शंकाचे निरसन करणे व त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देणे हे माझे मुख्य काम होते. 

दुपारपर्यंत काम संपून जायचे आणि संध्याकाळी मोकळा वेळ असायचा. त्या वेळात त्यांना अलाहाबाद-दर्शन घडवणे हादेखील माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीचा एक भाग होता. अर्थात, ती फारशी 'जबाबदारी' न वाटता माझ्या आनंदाचाच भाग होती हेही खरे. 

त्या ४-५ दिवसात माझी त्यांच्यासोबत चांगलीच गट्टी जमली. विशेषतः त्या नौदल अधिकाऱ्याशी माझे विशेष सूत जमले होते. त्याला दोन तीन कारणे होती. एक म्हणजे, मीही त्याकाळी मेजर हुद्द्यावर असल्याने आम्ही दोघे समकक्ष अधिकारी होतो. दुसरे आणि थोडे अधिक महत्वाचे कारण म्हणजे, तोदेखील बांगलादेश सिलेक्शन बोर्डावर माझ्यासारखाच, GTO पदावर कार्यरत होता. तिसरे कारण म्हणजे आम्हा दोघांच्याही स्वभावात असलेला मोकळेपणा. साहजिकच आमच्यात अगदी सुरुवातीपासूनच एकमेकांना अरे-तुरे करण्याइतकी जवळीक साधली गेली होती. आम्ही समवयस्कही असल्याने आमच्यात पुष्कळ संवादही होत असे. एकमेकांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दलही आमची चर्चा चाले. दोघांच्याही तोवरच्या जीवनप्रवासातले प्रमुख मैलाचे दगड एकसारखे असल्याने, हसून एकमेकांच्या हातावर टाळ्याही दिल्या जात. 

त्यामानाने, इतर तीन बांगलादेशी अधिकारी आमच्यापासून जरासे अंतर ठेवून राहत-बोलत असत. ब्रिगेडियरसाहेब तर त्यांच्या हुद्द्यामुळे आणि त्यांना थोडासा तोराही असल्याने त्यांच्याच इतर अधिकाऱ्यांशीही जरासे तुटकपणे वागायचे. मी त्यांचा संपर्क अधिकारी होतो म्हणून माझ्याशी जरा अधिक, पण कामापुरतेच बोलत असत!  

मला अलाहाबादला येऊन दीड-दोन वर्षे झाली होती. त्या काळात अलाहाबादमधील सर्व प्रेक्षणीय स्थळे आम्ही सहकुटुंब बघितली होतीच. शिवाय माझे आई-वडील, सासू-सासरे, आणि इतरही बरेच नातेवाईक आमच्याकडे येऊन, राहून गेल्यामुळे त्यांना दाखवण्याच्या निमित्ताने पुनःपुन्हा ती सर्व ठिकाणे मी पाहिली होती. त्यातील सर्वच स्थळांचे ऐतिहासिक संदर्भ मला बऱ्याच अंशी माहीत असल्याने, त्या बांगलादेशी अधिकाऱ्यांच्या 'गाईड' ची भूमिकादेखील मी अगदी सहज पार पाडली. 

'आनंद भवन' आणि 'स्वराज भवन' हे नेहरू कुटुंबाचे दोन आलिशान महाल व त्यामध्ये आज थाटलेले स्वातंत्र्यलढ्यातील वस्तूंचे संग्रहालय, गंगा-यमुनेचा संगम, नदीकाठचा ब्रिटिशकालीन किल्ला, नदीकाठालगतच असलेले ब्रिटिश अधिकाऱ्यांचे जुने-जुने प्रशस्त बंगले, अलाहाबाद हायकोर्टाची भव्य वास्तू, सिव्हिल लाईन्स भागातील पॉश दुकाने असे सर्व काही ३-४ दिवसात पाहून झाले. हिंडता-फिरता अलाहाबादच्या चटपट्या पदार्थांचा आस्वादही त्यांनी अगदी मिटक्या मारत घेतला.

शेवटच्या दिवशी त्या सगळ्या अधिकाऱ्यांकडून फर्माईश आली की सकाळचे काम जरा लवकर संपवून आम्ही दुपारीच बाहेर पडावे. त्या सर्वांना आपापल्या घरी काही ना काही नेण्यासाठी शॉपिंग करायचे होते. त्याप्रमाणे आम्ही निघालो. इतर दिवशी आम्ही बाहेर पडायचो तेंव्हा ब्रिगेडियरसाहेबांसाठी एक स्वतंत्र मोटरकार असायची. इतर तीन बांगलादेशी अधिकारी आणि मी वेगळ्या गाडीतून जात असू. त्या दिवशी मात्र ब्रिगेडियरसाहेबांनी मला त्यांच्या कारमध्ये बसायची विनंती केली. दोन्ही गाड्या सोबतच प्रवास करीत असल्याने मी कोणत्याही गाडीत बसलो असतो तरी काहीच फरक पडणार नव्हता. दुसऱ्या गाडीत चार अधिकारी बसणे फार अडचणीचेही नव्हते. आणि समजा तसे असते तरीही, अगदी शेवटच्या दिवशीच ब्रिगेडियर साहेबांना त्याची जाणीव व्हावी हेही जरा विचित्रच होते. 

त्यांची विनंती ऐकताच इतर अधिकाऱ्यांची काहीतरी नेत्रपल्लवी झाल्याचे मला जाणवले. माझ्या त्या नौदल अधिकारी मित्राने तर सर्वांची नजर चुकवत एक डोळा बारीक करून मला काहीतरी सुचवू पाहिले. ब्रिगेडियरसाहेबांची विनंती नाकारण्याचे मला काहीच कारण नव्हते आणि ते योग्य दिसलेही नसते. पण इतर तिघांसोबत हास्य-विनोद करीत जाण्याऐवजी या साहेबांसोबत जाणे जरा कंटाळवाणे होणार होते इतकेच.

गाडीत बसल्यानंतर ब्रिगेडियरसाहेबांनी माझ्यासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा करायचा प्रयत्न सुरु केला. गेल्या चार दिवसात फारशी जवळीक नसल्याने मी अदबीनेच पण जेवढ्यास तेवढे उत्तर देऊन टाकत होतो. त्यांना माझ्याशी वेगळे काहीतरी बोलायचे होते असे मला एकदा वाटले. पण बोलणे काही पुढे सरकेना. लवकरच आम्ही जुन्या अलाहाबादच्या बाजारपेठेत पोहोचलो. त्यानंतर पाचही जण एकत्र दुकाने पाहत हिंडू लागलो. एका मोठ्याश्या आणि जरा फॅन्सी वस्तूंच्या दुकानासमोर येताच त्यांच्यातला सर्वात ज्युनिअर असलेला तो नौदल अधिकारी जवळजवळ ओरडलाच, "Oh, look look ! Camay Soaps!"

मला काही कळायच्या आत ते सगळे अधिकारी त्या दुकानात शिरले. त्यांनी प्रत्येकी १०-१२ कॅमे साबण, फ्रेंच पर्फ्यूम्स आणि अश्याच काही 'इंपोर्टेड' वस्तू भराभरा विकत घेण्याचा सपाटा लावला. आधी मला खूपच नवल वाटलं. पण मग लगेच त्यांच्या वागण्याचं कारण लक्षात आलं. काही वर्षांपूर्वी मी आणि कदाचित माझ्यासारखे बरेच लोक 'इंपोर्टेड' वस्तू पाहून असेच हरखून जात असू. नौदलात असलेल्या माझ्या मित्रांना परदेशातून आलेल्या अश्या गोष्टी सहजी मिळत असत. त्यांच्याकडून मीदेखील एकदा असेच ५-६ कॅमे साबण मागवल्याचे मला आठवले. नुकतेच, म्हणजे १९९१ साली, भारताचे आर्थिक धोरण बदलले  होते. उदारीकरण, निजीकरण आणि जागतिकीकरण यांना वाव मिळू लागला होता. त्यामुळे या 'फॅन्सी' गोष्टी भारतात सहज उपलब्ध होऊ लागल्या होत्या. बांगलादेशात अजूनही त्या सहज उपलब्ध नसल्याने त्यांचे अप्रूप त्या सर्वांना वाटणे स्वाभाविक होते.

हळू-हळू, मुलांसाठी रेडिमेड कपडे, बूट-सॅंडल अश्याही वस्तू विकत घेऊन झाल्या. मग उगीच विंडो शॉपिंग करत आम्ही फिरू लागलो. मी व तो नौदलातला मित्र गप्पा करीत चालत होतो. ब्रिगेडियरसाहेब पुन्हा माझ्या जवळपास राहून काहीतरी बोलायचा प्रयत्न करीत आहेत असे मला जाणवत राहिले. शेवटी त्यांनी बंगाली भाषेत त्या इतर तिघा अधिकाऱ्यांना काहीतरी सांगितले. ते तिघेही "ओके सर" म्हणून पुढे निघाले. ते जाताच ब्रिगेडियर साहेबांनी मला दंडाला धरून जवळजवळ मागे खेचलेच. मला म्हणाले, "ते तिघे हिंडतायत तोवर आपण आणखी वेगळी दुकाने पाहू."

आम्ही आमच्या गाडीत येऊन बसताच त्यांनी त्यांच्या बॅगमधून एक पुठ्ठयासारखा जाडसर कागद काढला. त्या कागदावर स्टेपल करून लावलेले काही कापडाचे तुकडे होते. ते साहेब चोरट्या आवाजात बोलल्यासारखे मला म्हणाले, "इथल्या कापड बाजारात मला घेऊन चल. मी माझ्या बायकोच्या साड्यांचे तुकडे आणलेत. मला मॅचिंग ब्लाउझ पीसेस घ्यायचेे आहेत. तुला तुझ्या बायकोसोबत हिंडून सगळी दुकाने माहीत असतीलच."

एरवी एकदम कडक दिसणाऱ्या आणि आम्हा सर्वांपासून थोडे अंतर ठेवूनच राहणाऱ्या त्या साहेबांनी अचानक माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न का चालवला होता ते माझ्या लगेच लक्षात आले. 
"कितीही कडक मिलिट्रीमॅन असला तरी घरातल्या बॉसचे काम करायचे म्हटले की त्याची शेळीच होते" असे (मनातल्या मनात) म्हणून मी (मनातल्या मनातच) हसलो. 
हे 'अश्या प्रकारचं' शॉपिंग त्यांना करायचं होतं हे त्यांना त्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना समजू द्यायचं नव्हतं. म्हणूनच मला एकट्याला गाठायचा त्यांचा आटापिटा चालला असावा.

खरे तर, माझ्या पत्नीसोबतही मी कधीच साडी किंवा ब्लाऊझपीसच्या खरेदी मोहिमेत सामील झालेलो नव्हतो. त्यामुळे, मी काही फार अनुभवी होतो अशातला भाग नव्हता. पण त्या दिवशी मात्र, बांगलादेशी ब्रिगेडियरसाहेबांच्या बायकोची फर्माइश पुरी करण्यासाठी असंख्य दुकाने धुंडाळली. एकेका साडीचा तुकडा ताग्याला लावून-लावून खात्री करत, सगळे ब्लाउझपीसेस खरेदी करूनच आम्ही परतलो. 
   
सगळं शॉपिंग संपवून संध्याकाळी उशीरा आम्ही दोघे मेसमध्ये पोहोचलो. रात्री जेवणाच्या वेळी ते इतर तिघे अधिकारी माझ्यापाशी आले. माझा नौदल अधिकारी मित्र मला म्हणाला, "और फिर, बापट? बुड्ढे को सारे ब्लाउज पीस मिले कि नहीं?"
हे त्याने म्हणताच ते तिघेही अधिकारी मोट्ठ्याने हसू लागले. ब्रिगेडियरसाहेब दुरून पाहत होते. त्यांच्याबद्दलच काहीतरी बोलणे चालू आहे हे न कळण्याइतके बुद्दू ते निश्चितच नव्हते. मला मात्र कळेना, की त्या तिघांना हा सुगावा कसा लागला असेल. आम्ही सगळे मिळून हसत उभे आहोत हेे पाहून ब्रिगेडियर साहेबांना माझ्याबद्दलच शंका आली असणार हे नक्की. कारण, त्या वेळेपासून  तेे दुसऱ्या दिवशी आपल्या देशात परत जायला निघेपर्यंत साहेब माझ्याशी चकार शब्दही बोलले नाहीत. मी फारच अवघडून गेलो होतो.

ते लोक गेल्यानंतर आमच्या ड्रायव्हरकडून सगळा उलगडा झाला. आम्ही कुठे-कुठे आणि काय घ्यायला गेलो होतो हे त्या नौदल अधिकाऱ्याने, आमच्या ड्रायव्हरकडून गप्पा-गप्पात काढून घेतले होते!

त्या बांगलादेशी अधिकाऱ्यांची आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध अशी 'हेरगिरी' सुरू होती! आता बोला! 

18 comments:

  1. तुम्ही काहीही म्हणा बगुनाना, सर्व नवरे सारखे! 😊
    (पू लंच्या म्हैस मधलं वाक्य, थोडंसं बदलून.)

    ReplyDelete
  2. खुप छान वर्णन केले आहे.

    ReplyDelete
  3. Commenly seen in civil services,but in defence services also is .... different

    ReplyDelete
  4. छानच, प्रसंगच उभा राहिला... योग्य शब्दांची मांडणी आणि मनोरंजक विश्लेषण..!ड्रायव्हर लोक हे माहितीचे स्त्रोतच असतात..

    ReplyDelete
    Replies
    1. 🙏धन्यवाद!
      दुर्दैवाने, ब्लॉगरवर प्रतिक्रिया नोंदवणाऱ्यांचे नाव आपोआप येत नाही. त्यामुळे आपण कुणाला धन्यवाद देतोय ते कळतच नाही. 😒

      Delete
  5. So the takeeaway is that CO of the officer, is his wife !! I had met you when you were posted at Allahabad - 26 SSB was it? I cherish the time spent with you and family. You had explained the selection process so well. But I will trouble you for a refresher. As always you have shown excellent penmanship.
    Milind Ranade

    ReplyDelete
  6. कर्नल,अथः पासून इतिपर्यंत सर्व ब्लॉग एका बैठकीत वाचले.

    ReplyDelete
  7. Great Experiences,the above comment is mine.

    ReplyDelete
  8. मिलटरीच्या कडक शिस्तित अशा मजेशिर गोष्टी घडत असल्यामुळे थोडा टाइमपास मानसिक तणाव दूर व्हायला मदत होत असते.आपण सर्वजण मानसिक सुदृढ असता.हे हलकफुलक बर असत...

    ReplyDelete